परमभक्त अंडाल


             पाण्यात पाणी मिसळून जावे, दुधापासून खडिसाखरेला वेगळे राहताच येऊ नये त्याप्रमाणे कृष्णप्रेमात विरघळत गेलेली राधा आजही आपल्या मनात कृष्णासोबत, कृष्णाच्या खांद्यावर मान टेकवून, त्याच्या मुरलीत धुंद होऊन उभी आहे. कृष्णप्रेमापुढे विषही अमृताप्रमाणे सेवन करणारी मीरा, ‘मेरे तो गिरिधरनागर दूसरा कोय’ हा ठसा आपल्या हृदयावर कायमचा उमटवून आहे. तशीच कृष्णमय झालेली ही ‘अंडाल’! इसवीसनापूर्वी साधारणपणे 3000 वर्ष हा तिचा जन्मकाळ. घट भंगल्यावर घटाकाश (घटातील आकाश) आणि आकाश कधी एक झालं हे कळू नये इतक्या सहज पणाने कृष्णात समर्पित झालेली ही दाक्षिणात्य तामिळ मुलगी! अवघ्या पंधरा वर्षांचा आयुष्याचा काळ. वेल मांडवावर चढली की मगच फुलांनी बहरुन यावी असा काही नियम नाही. वयाच्या चवथ्या वर्षीच अंडालच्या वाणीवर कृष्णप्रेमाची फुलं फुलू लागली. अंडालचा अर्थच कृष्णाला आपल्या प्रेमाने धरुन ठेवणारी-  देवावरही स्वतःच्या उत्कट प्रेमाने अधिराज्य गाजविणारी!
                        श्रीकृष्णाच्या उत्कट भक्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या दाक्षिणात्य बारा कृष्णभक्त अल्वार संतांपैकी अंडाल ही एकमेव स्त्री संत असली तरी तिच्या ‘थिरुप्पावई’ ‘नचयियार थिरुमोझि’आणि ‘वरणम्-अयिराम’या रचनांमुळे आजही ती सर्व दाक्षिणात्य लोकांच्या मनात समईच्या प्रकाशासारखी तेवत आहे. थिरुप्पावईमधे 30 तर ‘नचिआर थिरुमोझि’ मधे अंडालच्या 143 भक्ति रचना आहेत. त्या जयदेवाच्या गीतगोविंदाशी साधर्म्य दाखविणाऱया आहेत. ज्या भक्तिभावाने रामायण महाभारत वाचले जाते त्याच भक्तिभावाने आणि प्रेमाने दक्षिण भारतात भक्त अंडालच्या रचना वाचल्या जातात. दर मार्गशीर्ष महिन्यात म्हणजे साधारणपणे संक्रांतीच्या आधी तीस दिवस सर्व दाक्षिणात्य मंदिरांमधे पहाटेच थिरुप्पावईचे मंजुळ आणि प्रसन्न सूर घुमत असतात.
              अंडाल आपल्या दहा सख्यांना उठवत असते  “चला चला उठा गोपिकांनो उठा! तयार व्हा. सुस्नात होऊन चला. आपल्याला त्या मनमोहन कृष्णाकडे जायचं आहे.” तिने रोज एकेका गोपीला उठवणे म्हणजे आपल्या दोन हात, दोन पाय, दोन डोळे, दोन कान, नाक आणि तोंड अशा आपल्याच दहा कर्मेंद्रियांना कृष्णभक्तीसाठी जागृत होण्याचा दिलेला आदेश तर नसेल ना? आपल्या सर्व कर्मेंद्रियांना वश करुन घेणारी ही अंडाल आपल्या सख्यांसह रंगनाथाच्या मंदिरात येते. तिथे सर्व मैत्रिणी द्वारपालाला आत जाऊ देण्यासाठी खूप विनवणी करतात. द्वारपालाकडून परवानगी घेतलेल्या ह्या सख्या हळुवारपणे कृष्णाला जागे करतात आणि तो कमलनयन कृष्ण जागा झाल्यावर त्याचे उठणे, त्याचे सिंहासारखे चालणे, ह्या सगळ्या सगळ्याचा एक चलत् चित्रपटच अंडाल तिच्या अक्षर-वाङ्मयातुन आपल्या डोळ्यासमोर साकार करते. अंडालच्या तिरुप्पावई या तामीळ रचनांमधे अंडाल म्हणते-
पावन होउन देह मनाने, सुमनांजलि अर्पुनी
आळविते मी तन्मयतेने, नाव तुझे श्रीहरी।
पावनतेची मूर्त निरंतर, राहे मम अंतरी
मथुरेचा मायावी बालक, मनमोहन श्रीहरी।
पावन मंगल महान जीवन, तुझेच यमुनापती
गोप चिमुकला व्रजभूमीचा, भास्कर तेजोनिधी।
जन्म देउनी धन्य देवकी, धन्य यशोदा जगी
बांधुन ठेवी दाव्याने ती, निराकार तो हरी।
पर्वत जळती पापांचेही, मुकुंद स्मरता मनी
जळून जाती ढीग रुईचे, अनल स्पर्शता क्षणी।।
हे कल्याणकारी हरी!!
--------------------------------------------------------
पुत्र होउनी जन्म घेइ जो , देवकीच्या उदरी
रातोरातचि पोचविले ज्या, गुपचुप गोकुळ-घरी।
वाढविला जो यशोमतीने, लाडाने श्रीहरी
कृष्ण कृष्ण ही आग धधकती, जाळी कंसा उरी।
कंसाची ती दुष्ट खलबते, उधळुन लावी पुरी
बाल मल्ल तो मोहवी मजला, राही नित अंतरी।
मोहुन तुझिया पराक्रमाने, अचंबीत होउनी
आले मी रे तुझिया चरणी, कृपा करी मजवरी ।
कमलापति हे कमलनयन तू, करिते तव मी स्तुती
दुःख हरी हे भवभयहारी, तारी मज संकटी।
हे कल्याणकारी हरी!!
----------------------------------------
देवाकडे मागणे मागतांनाही अंडालनेदेवाला फार सुंदर साकडे घातले आहे.
वर्षा व्हावी ऐसी सुंदर। जग व्हावे हे पवित्र मंदिर
डुलोत शेते सोनेरीसर। आनंदाने नित वाऱयावर।।
पाण्यामधुनी मासे सुळकन । उड्या मारु दे वर खाली वर
वासरु गोंडस बघता अवखळ । गायी देवो दूध मधुरतर।।
राहो अवनीवर1 समृद्धी।जीवमात्र हे नको उपाशी
मऊ पाकळी करुनी गादी । त्यावर झोपावी मधमाशी।।
तुझ्याच चरणी नित्य निरंतर । कृतज्ञतेने करोचि वंदन
भक्तवृंद हे तृप्त मनाने । नामाचे तव करोत चिंतन।।
अवर्षणाचे नकोच संकट । अति पाऊस वा पूर भयंकर
पालनकर्ता तूच जगाचा । दुःख हरी अमुचे परमेश्वर।।
हे कल्याणकारी हरी!!

(अंडालच्या तामिळ रचनांचा केलेला हा मराठी भावानुवाद)
अंडालचे मूळ नाव कोडाई - आपली गोदाईच म्हणाना! पेरियाल्वार विष्णुचित्त हे अल्वार संत, रोज पहाटेच उठून कृष्णाच्या पूजेसाठी फुले, तुळशी खुडत असत. एक दिवस नेहमीप्रमाणे श्रीविल्लिपुत्तुरच्या मंदिराच्या देवराईत फुले खुडत असतांना तुळशीच्या झाडाखाली निराधार अवस्थेत सोडून दिलेली एक छोटी नवजात बालिका त्यांना दिसली. विष्णुचित्त त्या गोंडस बालिकेला घेऊन घरी आले. धरणीमातेनी दिलेली सुंदरशी भेट म्हणून तिचे नावही त्यांनी गोदाई ठेवले. आजही दक्षिण भारतात श्री अंडालला प्रत्यक्ष धरणीमाताच मानले जाते. जिथे ही बालिका सापडली ते ठिकाण मदुराई पासून 80 कि.मी. वर असलेले श्री विल्लिपुत्तुरचं मंदिर,अंडालचे जन्मस्थान म्हणून तिलाच समर्पित करण्यात आले आहे.
             विष्णुचित्तानीमोठ्या प्रेमाने वाढवलेली ही पोर वडिलांकडून कृष्णभक्तीचे बाळकडू घेतच मोठी होऊ लागली. आणि थोड्याच दिवसात ‘पहावे मी जेथे जेथे सावळाच उभा तेथे’ अशी तिच्या मनाची अवस्था होऊन गेली. अंडाल विष्णुचित्तांना फक्त आपले वडीलच नव्हे तर गुरूही मानू लागली. त्यांच्याबरोबरीने  आपल्या गोड आवजात त्या दीनबंधू भक्तवत्सल कृष्णाची भजनेही (पलांडु) गाऊ लागली. तिच्या शब्दाशब्दातून तिची कृष्णभक्ती आणि प्रेम ओसंडून जात असे. पहिल्यांदा तिच्या ह्या कृष्णभक्तीला लोकांनी वेड्यातच काढले आणि कृष्णासाठी पागल झालेल्या ह्या मुलीलाही वेडे ठरवले. पण विष्णुचित्तानी मात्र अंडालच्या ह्या भक्तिभावाला कधीच हिणवले नाही. त्यांना तिची कृष्णाप्रति असलेली ही अनन्य भक्ती पाहून कायमच तिचा अभिमान वाटत असे. ब्राह्मण कुळात जन्मलेली ही मुलगी स्वत:ला कृष्णाची गवळण सखी समजुन गवळणींसारखेच कपडे घालून फिरे.
                    एक दिवस गोदाईला स्वप्न पडले. प्रत्यक्ष भगवान विष्णु गजराजावर बसून अंडालशी विवाह करण्यासाठी आले आहेत. तिने हे स्वप्न आपल्या पित्याला सांगितले. अंडाल आणि भगवान विष्णुंच्या विवाहसोहळ्याचे हे वर्णन अतिशय उत्कटपणे तिने आपल्या ‘वरणम् अयिराम’ ह्या काव्यात रेखाटले आहे. कृष्णमय झालेल्या गोदाईने तारुण्यात पदापर्ण केले ते कृष्णाशीच लग्न करीन हा निश्चय करूनच. तिचे आयुष्यच कृष्णमय होऊन गेले. कृष्णावाचुन दुसरा विषयच तिला उरला नाही. ‘पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभावे’ अशी गत झाली तिची.
                           गोदाई रोज कृष्णासाठी फुलांचा हार गुंफत असे. कृष्णप्रेमाने भारावून गेलेलल्या कोडाईच्या मनातला द्वैतभाव तर कधीच संपून गेला होता. कृष्णाला केलेला हार आपल्या गळ्यात घालून कृष्णाच्या नववधूच्या रूपात स्वतला आरशात किंवा विहिरीच्या पाण्यात निरखताना ती स्वतच कृष्णमय होऊन जाई. एकदिवस कृष्णाला अर्पण करण्यासाठी अंडालने गुंफलेला हार घेऊन विष्णुचित्त जात असतांना हाराबरोबर आलेला गोदाईचा केस पाहिल्यावर विष्णुचित्त रागवले. गोदाईला चांगलेच रागे भरुन त्याने दुसरी ताजी फुले खुडून परत हार गुंफला आणि रंगनाथाला अर्पण केला. कृष्णाला आपला हार  अर्पण करण्याने गोदा रात्रभर तळमळत होती. त्याच रात्री विष्णुचित्तांना स्वप्नदृष्टांत झाला. भगवान नारायण त्यांच्या स्वप्नात आले. त्यांनी विष्णुचित्तांना सांगितले - “गोदाईच्या अंगाचा सुगंध तू वाहिलेल्या हाराला नाही रे विष्णुचित्ता! गोदाईनी केलेला आणि स्वतः घालून पाहिलेलाच हार मला आवडतो. जा तिने केलेला हार घेऊन ये.” विष्णुचित्त धावत घरी गेले आणि गोदाईने केलेला आणि घातलेला हार घेऊन आले.  त्यांनी तो हार भगवान नारायणाला अर्पण केला. भगवान प्रसन्न झाले. मोठ्या प्रेमाने कृष्णासाठी केलेला हार आपल्या गळ्यात घालून मग कृष्णाला अर्पण करणारी गोदाई त्या दिवसापासून अंडाल झाली. फुले गुंफता गुंफता अंडालने कृष्णालाही आपल्या प्रेमाच्या धाग्यात घट्ट बांधून घेतले. सारे संतही गोदाईला आता फार मानू लागले. कृष्णालाही वश करून घेऊन त्याच्यावरही आपला हक्क सांगणाऱया या मुलीला संतगण  प्रेमाने अंडाल म्हणू लागले.
             अंडालच्या विवाहाचे वेध विष्णुचित्तांना लागले. दक्षिणेत पेरियाल्वार विष्णुचित्तांना लोकं गरुडाचा अवतार मानतात. त्यांना अंडालचा विवाह भगवान विष्णुंशी व्हावा असे मनोमन वाटत होते. तरीही जगरहाटी प्रमाणे अंडालचे लग्न करुन देणे भागच होते.  पण रंगनाथाशिवाय मी कोणाशीच लग्न करणार नाही असे अंडालने निक्षून सांगितले. ह्या हट्टी मुलीपुढे आता करावे तरी काय असा प्रश्न विष्णुचित्तांना पडला. त्याचवेळी परत एकदा भगवान रंगनाथ विष्णुचित्तांच्या स्वप्नात आले. त्यांनी सांगितले, ``विष्णुचित्ता ऊठ! अंडालच्या लग्नाची तयारी कर. उद्या तिला संपूर्ण वधूवेषात श्रीरंगमच्या देवळात माझ्याकडे पाठव.”  त्याचवेळी श्रीरंगमच्या मंदिराच्या पुजाऱयांनाही  स्वप्न पडले. प्रत्यक्ष भगवान रंगनाथ सांगत होते  - “उद्या सकाळी अंडाल मला भेटायला येणार आहे. तिच्या स्वागताची तयारी करा.”
                        दुसर्या दिवशी मंदिराचे पुजारी मंदिर सजवून अंडालची वाट पाहू लागले. स्वप्नाची हकिकत हा हा म्हणता लोकांनाही कळाली आणि अनेकजण अंडालला पाहण्यासाठी मंदिरात आले. इकडे विष्णुचित्तांनी गोदाईच्या विवाहाची सर्व तयारी केली. रंगनाथाबरोबर विवाहाच्या कल्पनेने अंडाल मनातून मोहरून आली. ती आरशात पाहून साजशृंगार करु लागली - - तिच्या लाडक्या मनमोहनासाठी! तिच्या दाही सख्या तिला सजवू लागल्या. तिची गोड थट्टाही करू लागल्या. आरशातून तो सावळाही जणु तिच्याकडे रोखून बघत मिश्कील हसत होता. तिला म्हणत होता -“अंडाल पुरे पुरे आता लवकर ये तुझ्या शिवाय नाही राहु शकत मी एकटा!”  तिच्या श्वासाश्वासातून हृदयाच्या ठोक्याठोक्यातून एकच नाद घुमत होता - कृष्ण - - कृष्ण -कृष्ण - -कृष्ण! वधूवेषात अंडाल पालखीत बसली. आपल्या प्रियकराला भेटायला आतुर झालेली अंडाल श्रीरंगाच्या दर्शनाला इतकी आसुसली होती की एक एक क्षण तिला जणु युगायुगासारखा भासत होता. भगवान रंगनाथाच्या देवळात पोचल्यावर मात्र अंडाल आपल्या भावना आवरु शकली नाही. पालखीतून उडी मारुन देहभान हरपून ती रंगनाथाकडे धावत सुटली. धनुष्यातून सुटलेला बाण जसा लक्ष्यात घुसूनच थांबतो, ढगातुन सुटलेल्या धारा जशा पृथ्वीवरच पोचतात, पर्वतात उगम पावलेली सरिता जशी सागरालाच मिळते किंवा अंकोल वृक्षाच्या‡ बिया जशा परत अंकोलाच्या खोडालाच येऊन चिकटतात, तशी अंडाल सगळ्या गर्दीमधून धावत होती. कृष्णाचे सावळे रूप पाहून तिच्या डोळ्यातून आनंदाश्रूंचा पूर वाहू लागला. “रंगनाऽऽऽऽथाऽऽऽऽऽ!”अशी हृदयापासून साद घालत तिने कृष्णाच्या पायाला घट्ट मिठी घातली. नभात विजेची तळपती रेखा चमकुन क्षणार्धात कृष्णमेघात विलीन व्हावी तशी अंडालची चैतन्यमय देहलता सावळ्या कृष्णमूर्तीत विलीन झाली.आत्म्याचे आणि परमात्म्याचे मीलन झाले. चैतन्य सरिता चैतन्य सागरात विलीन झाली.अंडाल कृष्णमय होऊन गेली. लोकांच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही. विष्णुचित्तांचे विस्फारलेले डोळे आपल्या लाडक्या लेकीचा विवाह सोहळा पाहुन भरून आले.  सासरी चाललेल्या आपल्या मुलीला त्यांनी गालावरुन ओघळणाऱया अश्रूंना  आवरताच मनोमन आशीर्वाद दिला.
आजही दाक्षिणात्य देवळात श्रीकृष्णासोबत अंडालचीही मूर्ती असतेच. तिच्याशिवाय कृष्णालाही पूर्णत्व नाही!
---------------------------------------------------------------
Image result for pictures of Andal temple  Image result for pictures of Andal temple
(श्री अंडालचे श्रीविल्लिपुत्तुर येथील मंदीर, मदुराई पासून 80.5 कि.मी. वर आहे गाडीने दिड तासच्या अंतरावर आहे. गुगल मॅपवर माहिती उपलब्ध आहे.)

अंकोल -अंकोल हे एक अद्भुत झाड म्हणावं लागेल. फेब्रुवारी मार्चमधे याला फुलं येतात. एप्रिलमधे ह्याची फळं तयार होऊन झाडाखाली पडतात. त्याच्यावरचा गोड गर मुंग्या, किडे, पक्षी खातात. आणि आतल्या बिया इतस्तत पसरतात. आणि काय गम्मत - -एका रात्री पहिला पाऊस,वीजांचा कडकडाट सुरू झाला की ह्या सर्व बिया झाडाच्या खोडाला ,फांद्यांना येऊन चिकटतात. झाडाला बांधलेल्या सिमेंटच्या पारालाही ह्या बिया चिकटलेल्या दिसतात. आद्य शंकराचार्यांनी रात्री प्रयत्न करूनही ह्या बिया झाडाला कशा चिकटतात हे त्यांना समजू शकले नाही.
----------------------------
Hello Arundhati,

When you go to  the Pittsburgh temple there is Andal devi's moorty alon with shri Venkatesha.   I did not feel like finding out more about her. I am so happy that you have sent this.  

Sudha Puranik

No comments:

Post a Comment